मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. त्याचा फटका आयपीएललाही बसला आहे. येत्या २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार होती. मात्र ही स्पर्धा आता १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतीची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केली आहे.
करोना व्हायरसच्या भितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकला अशी मागणी होत होती. त्या संदर्भात दबाव वाढला होता. केंद्र सरकारने देखील यावर्षी स्पर्धा घेऊ नये असा सल्ला दिला होता आणि स्पर्धा घेणार असाल तर त्या रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय घ्याव्यात असे सरकारचे म्हणणे होते.
बीसीसीआयने स्पर्धा पुढे ढकलण्याची घोषणा करण्याआधी दिल्ली सरकारने राज्यातील सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यात आयपीएलचा देखील समावेश असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य आणि आयपीएलमधील शेअरहोल्डर्स यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात बीसीसीआय भारत सरकार, क्रीडा मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संपर्कात असल्याचे शहा यांनी निवेदनात म्हटले आहे.