चेन्नई: सिद्ध अभिनेते कमल हसन यांनी बुधवारी चेन्नईच्या मद्रास विद्यापीठात जाऊन सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. ते या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते. मद्रास विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे.
कमल हसन यांना विद्यापीठात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली नाही. कमल हसन हे अभिनेते तर आहेत पण त्याचबरोबर आता ते राजकारणातही सक्रिय झाले आहेत. त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढला आहे.
सध्या देशभरात नागरिकत्व कायदयाविरोधात आंदोलन सुरु आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. देशामध्ये अशांतता पसरली आहे. जाळपोळ, आंदोलन, निदर्शने होत आहेत. ईशान्य भारतात ब-याच ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जामिया मिलीयाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जो अमानुष लाढीहल्ला केला त्यानंतर देशात वातावरण आणखीणच चिघळले आहे.
कमल हसन म्हणाले मी मरेपर्यंत विद्यार्थीच राहणार…
मरेपर्यंत मी विद्यार्थीच राहणार. विद्यार्थी या नात्याने पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथे आलो आहे. मी राजकारणात असतो किंवा नसतो तरी आवाज उठवलाच असता. आता मी राजकीय पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे येथे येणे माझे कर्तव्य आहे. आमच्या विद्यार्थ्यांना शरणार्थी बनवले आहे. मी एक राजकारणी म्हणून इथे आलेलो नाही. आता संपूर्ण भारतात या मुद्दावरुन आवाज उठवला जात आहे. तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही.