नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेडगे यांना सरकारमध्ये तसेच संसदेमध्ये राहण्याचा अधिकार नसल्याची घणाघाती टीका करत विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातला. या गोंधळामुळे राज्यसभा १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली होती. वेळोवेळी संविधानात बदल झाले आहेत आणि आम्ही सुद्धा असे बदल करणार असून त्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध करत विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातला.
राज्यसभेचे कामकाज सुरु होताच हेडगे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. ‘भारतीय संविधानावरील विश्वास गमावलेल्यांना सरकारमध्ये किंवा संसदेमध्ये राहण्याचा अधिकार नाही’ असे सांगत राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाब नबी आझाद यांनी सरकारला फटकारले.
‘धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्यांना स्वतःचे मूळ माहिती नाही. संविधानानेच त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण, याच संविधानात वारंवार बदल करण्यात आले आहेत आणि आता आम्हीही असे बदल करू हे त्यांनी लक्षात ठेवावे’ असे वादग्रस्त वक्तव्य कोप्पल जिल्ह्यातील कुकानूर शहरात ब्राह्मण युवा परिषदे दरम्यान आयोजित एका कार्यक्रमात अनंत कुमार हेडगे यांनी केले होते.
‘जर एखादा व्यक्ती स्वतःला मुस्लिम, हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध म्हणवून घेत असेल तर त्याचा मला अभिमान वाटेल. कारण त्याच्या धर्माशी आणि जातीशी त्याची बांधिलकी आहे. परंतु, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे कोण आहेत? त्यांना स्वतःचे मूळही ठाऊक नाही’ असेही अनंत कुमार हेडगे म्हणाले होते. या वक्तव्याचा निषेध करत विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातला होता. या गोंधळामुळे राज्यसभा १२ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आली होती.