हैदराबाद | बाबरी मशीदीची जागा कुणालाही भेट देणार नाही, ही जागा विकणारही नाही तसेच या जागेवरील बाबरी मशीद इतरत्र हालवणारही नाही, अशी भुमिका पुन्हा एकदा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायम ठेवली आहे. त्याचबरोबर अयोध्येतील जागेचा वाद सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर यांची बेंगळूरू येथे भेट घेऊन फॉर्म्युला सुचवणाऱ्या मौलाना सलमान नदवी यांची बोर्डाने हाकालपट्टी केली आहे. नदवी यांच्या या तोडग्यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नाराज होते. त्यामुळे नदवी यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी ४ सदस्यीय समिती नेमण्यात आली होती.
बोर्डाचे सदस्य कासिम इलियास यांनी मौलाना नदवी यांच्या हाकालपट्टीची माहिती रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, समितीने घोषणा केली आहे की, बाबरी मशीदीची जागा कोणालाही भेट देता येणार नाही, विकता येणार नाही किंवा मशीद या जागेवरून हालवताही येणार नाही. बोर्डाने घेतलेल्या या एकमताच्या विरोधात मौलाना नदवी गेल्याने त्यांची हाकालपट्टी करण्यात आल्याचे इलियास यांनी स्पष्ट केले.
कारवाईपूर्वी नदवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, अयोध्या वादावर तोडग्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे. त्यांनी सांगितले होते की, श्री श्री रविशंकर यांनी २० फेब्रुवारीला अयोध्येत दोन्ही पक्षांची बैठक बोलावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. दरम्यान, श्री श्री रविशंकर यांची भेटीवेळी त्यांनी वादग्रस्त जागेवर मंदीर आणि इतर जागेवर मशीद बनवण्याबाबत तीन पर्याय दिले होते. हे पर्याय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि बाबरी मशीदीशी जोडलेल्या दुसऱ्या पक्षकारांनी फोटाळून लावले होते.
शुक्रवारी हैदराबाद येथे बोर्डाची तीन दिवसीय बैठक सुरु झाली. यामध्ये मौलाना यांच्या फॉर्मुल्यावर टीका करण्यात आली. या बैठीकीत नदवींचा त्यांच्यासमोरच अपमान करण्यात आला. कमाल फारुकी आणि एस. क्यू. आर. इलियासी यांनी त्यांचा अपमान केल्याचा आरोप नदवींनी केला होता. आपल्याला शांतता आणि धार्मिक सौहार्द हवे असल्याचे नदवी यांनी म्हटले आहे. तसेच सध्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये हुकूमशाही सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.