मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील दोन कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेते, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर धोका असल्याचा दावा डॉ. जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०१९ मध्ये फडणवीस सरकारने डॉ. जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाव्यवस्था काढली होती. निवडणुकीच्या कारणामुळे आधी सुरक्षा काढली होती. ठाणे पोलीस दलाकडून आव्हाडांना सुरक्षा दिली जात होती. त्याआधी २०१८ मध्येही डॉ. आव्हाडांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र आव्हाड हे सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर असल्याचं गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट करुनही तत्कालिन भाजप सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने फडणवीस सरकारवर केला होता. दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत-पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या सुरक्षेत कधी वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.