मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. मी माझ्या वाढदिवसाला किमान एक झाड लावेन आणि त्याचे संगोपन करेन अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांसहित सर्वांनीच घेतली.
मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर…
देशातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा, गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली आहेत. महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो.