मुंबई : झारखंडमध्ये भाजपने सत्ता गमावलेल्यानंतर भाजपवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवारांची आज सोमवारी त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद झाली यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपाला स्वीकारलं नाही. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
भाजप झारखंडसह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे असेही पवार यांनी सांगितले.
सत्तेवर आलेल्या पक्षाने योग्य पावलं उचलायची असतात. आत्ताचे सत्ताधारी परिस्थिती चिघळेल अशी भूमिका घेताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून रस्ता मिळाला, त्यातूनच झारखंडमध्ये भाजपाच्या विरोधात सगळे एकत्र आले असंही वक्तव्य पवार यांनी केलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला धडा शिकवला. इतर राज्यांमध्येही संधी मिळाल्यानंतर जनताच भाजपाला धडा शिकवेल असंही पवार यांनी म्हटलं आहे.
CAA आणि NRC आणून सरकार स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न…
CAA आणि NRC आणून सरकार स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच समाजात धार्मिक अंतर वाढवण्याचाही या सरकारचा प्रयत्न आहे असाही आरोप पवार यांनी केला.