मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असून, अजित पवारांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवारांच मन वळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. आज सोमवारी मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांनी मनधरणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजभवनात आमदारांच्या सह्यांचे पत्र दिल्यानंतर स्पष्ट केले होते की, आज आम्ही अजित पवारांची समजूत काढण्यासाठी अखेरचा प्रयत्न करु. त्यानंतर जयंत पाटीलसुध्दा अजित पवारांच्या मनधरणीसाठी मंत्रालयात पोहोचले. त्यामुळे अजित पवार यांचं मनवळवण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रीया सुळे, आमदार रोहित पवार यांच्याकडून भावनिक पोस्ट, टि्वट करुन अजित पवारांना साद घालण्याचे काम सुरु आहेत, तरी सुध्दा अजित पवार यांची भूमिका स्पष्ट झाली नाही. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी केल्यानंतर शरद पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र शेवटपर्यंत अजित पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले जाईल. असेच चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसत आहेत.