मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल. डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. राज्यातील राष्ट्रपती शासन दूर करण्यासाठी काही कायदेशीर बाबींमधून जावं लागतं. तसंच राज्यपालांना बहुमताचा आकडा पुरव्यांनीशी द्यावा लागतो. ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल, असंही राऊत म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आजची शेवटची बैठक आहे. प्रत्येक पक्षाची निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. शिवसेनेमध्ये जलदगतीने निर्णय घेतले जातात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे निर्णय घेत होते. त्यांच्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे सर्व निर्णय घेतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे निर्णय घेतात. काँग्रेस शंभर वर्ष जुना पक्ष असून तेथे निर्णय प्रक्रियेला उशीर लागतो. चिंतेचं कारण नाही. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच मजबूत सरकार बनेलं असंही राऊत यांनी सांगितलं.
राष्ट्रपती शासनादरम्यान कोणीही सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यास ते सरकार स्थापन करू शकतात. ज्या लोकांना वाटतं राज्यात लोकप्रिय सरकार येऊ नये, प्रदीर्घ काळ राष्ट्रपती शासन रहावं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये, असे लोक निरनिराळ्या बातम्या पेरत असतात, असंही त्यांनी नमूद केलं. शिवसेनेत कोणताही संभ्रम नाही. असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.