भिवंडी : वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेला होता. दुगाडफाटा येथे झालेल्या या अपघातात डॉ. नेहा शेख या तरुणीच्या बळीनंतर राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. सरकारने सुप्रीम कंपनीचे या महामार्गावरील अनगाव आणि वाघोटे येथील टोलनाके बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारला उशीरा सुचलेल्या शहाणपणाचीच चर्चा सुरु आहे.
डॉ. नेहा शेखच्या मृत्यूनंतर नागरिकांनी सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं होतं. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने अखेर हे टोलनाके बंद केले, त्याशिवाय सुप्रीम कंपनीसोबत असलेला करारही रद्द करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी यांनी दिले. त्याचप्रमाणे ह्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेशही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.
सुप्रीम कंपनीने बांधकाम केलेला भिवंडी-वाडा माहामार्ग हा अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचा असल्याने या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळे आतापर्यंत 350 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची घरं उध्वस्त झाली आहेत. हजारो लोकांना कायमचं अपंगत्व आलं. त्यामुळे कंपनीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर उच्च न्यायालयाने कंपनीला सहा महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कंपनीने ते पूर्ण केलं नाही. या सर्वांमध्ये काही दिवसांपूर्वी डॉ. नेहा शेख यांचाही या महामार्गावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन केलं आणि अखेर सरकारने सुप्रीम कंपनीवर कारवाई केली. याप्रकरणी कंपनीचे संचालक विक्रम शर्मा आणि चेतन भट यांच्याविरोधात कलम 420 आणि सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.