सांगली : काँग्रेस राष्ट्रवादीला धक्के पे धक्के बसत असताना त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचाही समावेश झाला आहे. प्रकाश आंबेडकरांना हा चौथा धक्का बसला आहे. वंचितचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पडळकर पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
वंचितमधून सर्वप्रथम औरंगाबादच्या उमेदवारीवरून बी.जी कोळसे पाटील पक्ष सोडला होता. त्यांतर लक्ष्मण माने यांनी वंचितमध्ये संघाच्या लोकांची खूसघोरी झाली आहे, आंबेडकर लोकसभेत काँग्रेस महाआघाडीत जाणून बुजून गेले नाही, किमान चार पाच खासदार वंचितचे निवडणून आले असते. आंबेडकर हे संघासाठी काम करत असल्याचा आरोप करत त्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. माने नंतर एमआयएमनेही वंचितपासून फारकत घेतली होती. आता पडळकर यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे वंचितला एक एक धक्के बसत आहेत.
माझे प्रकाश आंबेडकर यांच्याशी वाद नाहीत. त्यांच्याबरोबर आजही माझे चांगले संबंध आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ‘वंचित’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा मी राजीनामा देत आहे. आजपासून मी वंचितचं काम बंद केलं आहे. दोन दिवसात माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. असे पडळकरांनी माध्यमांना सांगितले.
सगळयाच पक्षांकडून मला ऑफर आहे, असा दावाही पडळकरांनी केला. परंतु त्यांचा प्रवेश भाजपात होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पडळकर सांगलीतील जत किंवा खानापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढणार आहेत.
लोकसभेवेळी सांगलीत भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत झाली होती. सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील रिंगणात होते. संजयकाका पाटील पाच लाख आठ हजार मतं मिळवत विजयी झाले होते. स्वाभिमानीचे विशाल पाटील 3 लाख 44 हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. तर पडळकरांनाही तीन लाख मतं मिळाली होती. त्यामुळे विधानसभेतही पडळकरांना भाग्य आजमावयाचे आहे.