त्रिपुरा: महाभारताच्या काळापासून इंटरनेट होते असा जावईशोध लावणारे भाजपाचे नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी डायना हेडनला मिळालेल्या ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आगरतला येथे हातमाग कलाकाराच्या कार्यक्रमात बोलताना बिप्लब देब यांनी सौंदर्याचा विषय काढला व मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या ऐश्वर्या राय आणि डायना हेडनची तुलना केली.
भारताचे खरे सौंदर्य ऐश्वर्या रायमध्ये आहे. डायना हेडन भारतीय सौंदर्याचे प्रतिनिधीत्व करत नाही. देवी लक्ष्मी, सरस्वती सौंदर्याचे उत्तम उदहारण असून भारतीय सौंदर्य तसे असले पाहिजे. सलग पाचवर्ष ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ चा किताब भारताला मिळत होता. जो कोणी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा त्याला हा किताब मिळायचा. डायना हेडनलाही तसाच किताब मिळाला. डायना हेडन या किताबासाठी योग्य होती असे तुम्हाला वाटते का?
लोक म्हणतील बिप्लब देब वाद उत्पन्न करतोय. ऐश्वर्याला रायला हा किताब मिळाला कारण तिच्यामध्ये भारतीय सौंदर्याचे ते सर्व गुण आहेत असे बिप्लब देब म्हणाले. भारतीय महिला कॉस्मेटिक किंवा शॅम्पू वापरत नाहीत. केस गळू नये यासाठी मेथीच्या पाण्याने आपण केस धुतो. सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारे हे आंतरराष्ट्रीय मार्केटिंग माफिया आहेत. असे किताब देऊन ते १२५ कोटी भारतीय लोकसंख्येची बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करतात असे देब म्हणाले. ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ चा किताब सलग पाचवर्ष भारतीय महिलांना देण्यामागे मार्केटिंगची रणनिती होती असा दावा बिप्लब देब यांनी केला. त्यांच्या त्या विधानावरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली.