अहमदनगर: अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी तपास करणार आहे.
अहमदनगरमधील केडगाव उपनगरात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची शनिवारी संध्याकाळी गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, अरुण जगताप आणि भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या हत्येप्रकरणी आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर व भानुदास कोतकर या चौघांना रविवारी अटक केली. तर भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. अहमदनगरमधील घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाली होती. शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गृहखात्यावर टीकेची झोड उठवली होती. पोलिसांच्या संगनमतानेच ही घटना घडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
गृहखात्याने तडकाफडकी एसआयटीची स्थापना केली….
अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली.एसआयटीमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी दिलीप पवार, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांचा एसआयटीत समावेश आहे.