भाजपाच्या स्थापना दिनाचा उत्सव भाजपाच्या मंडळींनी बीकेसीवर लाखो रुपयांची उधळपट्टी करत साजरा केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे अध्यक्ष रावसाहेब दानवे,ना.चंद्राकांत पाटील,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाषणं निव्वळ आरडा ओरड आणि पोकळ धमक्या होत्या. आत्मविश्वास गमावलेल्या भाजपाच्या नेत्यांनी आजही थापा मारण्यापलीकडे काहीच केले नाही. देशात आणि राज्यात सामाजिक एकता, अखंडता धोक्यात आणणा-या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी, परराष्ट्र निती, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाड्यांवर सरकारला ला अपयश आलेलं आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या. सर्वगौडबंगाल असतांना भाजपाने कोट्यवधी रुपयांचा चुराडा का आणि कशासाठी केला? एवढा पैसा त्यांच्याकडे आला कोठून. एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज माफि मिळालेली नसतांना इव्हेंट तमाशा खर्च करुन भाजपाचा स्थापना दिवस साजरा केला. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणात आत्मविश्वास नव्हता. जनतेला सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नव्हते. कारण कोणतेही विकासात्मक कामे झाली नाही. रोजगार, महागाईवरुन जनता त्रस्त असतांना हा तमाशा कशासाठी? मंत्रालयाला आत्महत्यालय करणारे शेकडो कोटींची उधळपट्टी करून स्थापना दिवसाचा उत्सव साजरा केला. हा कसला उत्सव आहे? शेतक-यांच्या मरणाचा उत्सव का? उत्सवासाठी खर्च झालेले कोट्यवधी रूपये कुठून आले? निरव मोदींकडून की विजय माल्याकडून? स्वत:च्या पक्षाला पारदर्शक म्हणून पाठ थोपटणाऱ्यांच्या राज्याच्या मंत्रीमंडळातील २१ मंत्र्यांवर गंभीर घोटाळ्य़ाचे आरोप आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील घोटाळेबाज मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले भाजप अध्यक्ष अमित शहा भ्रष्टाचाराच्या डोंगरावर उभे राहून पारदर्शकतेच्या वल्गना करित आहेत हे हास्यास्पद आहे. गोळवलकरांच्या विचारधारेतून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. भाजपाच्या नेत्यांच्या मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा आहे. आरक्षण हटवू देणार असे अमित शाह आणि त्यांच्या पक्षातील बगलबच्चे आता बोलायला लागले आहेत. परंतु मोहन भागवतांनी संघ आणि भाजपचे आरक्षण विरोधी मत अगोदरच प्रदर्शित केलेले आहे. राहुल गांधींना चार पिढयांचा हिशोब अमित शहांनी मागितला परंतु ज्या गांधी कुटुंबियाचा त्यागाचा बलिदानाचा इतिहास आहे त्यांना शाह यांनी हिशेब मागणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे. राहुल गांधीजींच्या परिवारातील पंडित नेहरूंनी देशासाठी १० वर्ष तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी,राजीव गांधी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. संघ परिवारातील एकाही नेत्यांची करंगळी देशासाठी कापली गेली नाही. काँग्रेस व गांधी परिवाराने देशासाठी त्याग करून पायाभरणी केली. त्यातूनच एक तथाकथित चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकला. परंतु भाजपने घोटाळा करण्यासाठी तो चहा ही सोडला नाही. या सोहळ्यात्त मुख्यमंत्री फडणवीस आपण चार वर्षात काय केले हे आपल्या भाषणात सांगता आले नाही. भाजपाध्यक्षांनी आपल्या जुमलेबाज व्यक्तिमत्त्वाला साजेसे महाराष्ट्रात आत्महत्या कमी झाल्या आहेत. गुंतवणूक वाढली आहे. भ्रष्टाचार कमी झाला आहे अशा हास्यास्पद कोट्या केल्या व २०१९ साठी काही नविन जुमले सोडले. परंतु आत्मविश्वास गमावलेल्या नेत्यांनी भाजपाच्या स्थापना दिवसाच्या नामावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुन तमाशा केला. त्यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींचे,मुला बाळांची हळहळ लागेल. भाजपा तमाशा पक्षाने बरबादी शिवाय काहीच केले नाही हे जनतेने ओळखले आहे.
– वैदेही तामण
मुख्य संपादक