मुंबई : भाजपला विधानसभेत बसलेला फटका. पक्षातील जुने नेते नाराज असल्यामुळे अंतर्गत वाट चव्हाट्यावर आला आहे. तसेच विधानसभेच्या तोंडावर मेगाभरती केल्यामुळे पक्षातील निष्ठावंतांना डावलून उप-यांना संधी देण्यात आली. पक्षाला मेगाभरतीचा फटका बसला अशी कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांना दिल्लीदरबारी बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे हे दिल्लीत बैठकीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये ४ वाजता बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीपासून भाजपमध्ये वाद सुरु आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच तिकीट कापण्यात आलं होतं. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. खडसे यांनी दिल्लीत त्यांच्या कन्येविरोधात काम करणा-या पक्षातील नेत्यांविरोधात तक्रार केलेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कोअर कमिटीसमोर नकार्थी सांगितल्यामुळे माझं तिकीट कापण्यात आलं होतं. असं खडसेंनी सांगितलं होतं.
दोन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपने मेगा भरती केल्यामुळे त्याचा फटका बसला ही भाजपची मोठी चूकं होती अशी कबुली दिली होती. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट असून, बाहेरच्या नेत्यांना संधी दिल्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. तसेच पक्षाला बळकटी देण्यासाठी व अंतर्गत धुसफूस दूर करण्यासाठी दिल्लीत होणा-या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहेत.