मुंबई : “देशात सीएए, एनआरसीवरून गोंधळ सुरू आहे. पण, केंद्र सरकारलाही विचारणार आहे. देशात सध्या जी आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. ती अराजकता लपवण्यासाठी हा कायदा करत आहात का? हे आधी स्पष्ट करावं,” मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
मुंबईमध्ये पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी आज मुंबईत (९ फेब्रुवारी) मोर्चा काढण्यात आला होता. राज ठाकरे म्हणाले, नागरिकत्व सुधारण कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात जे मोर्चे काढले ती ताकद कुणाला दाखवली. मला आज पर्यंत कळलं नाही. मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हे मोर्चे सुरूच राहिले तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.