मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन २०२२ साठी रणशिंग फुकले आहे. याचा भाजपने धसका घेतला असून भाजपने राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये ‘ट्विटर वॉर’ जुंपले आहे.
पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय… https://t.co/DtEgVUYXCd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 2, 2020
राज्यात सत्ता बदल झाल्यापासून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारेच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार…
‘राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात मुंबई पालिकेत ६० जागा जिंकू. तर, दुसरे नेते म्हणतात ५० जागा जिंकू. मुळात राष्ट्रवादीच्या आहे त्या ८ जागा टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याचं इतर प्राण्यात रुपांतर होत नाही. ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर. विनोदीच आहे सगळं! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!’, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीवर टीका केली होती. आशिष शेलार यांच्या या टीकेचा धनंजय मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला.
अजित पवारांना दिला होता हा मंत्र…
मुंबईतल्या सोमय्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पण यावेळी बोलता बोलता अजितदादांनी, ‘शिवसेना मुंबईत महापालिकत नंबर एक आहे. तर आपण फारच कमी आहोत. शिवसेनेला नंबर एक राहू दे आपण त्यांच्या बरोबरीने आपला नंबर वाढवू’ असं म्हटलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला टाळा वाजवून प्रतिसाद दिला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक ८ वरुन ६० झाले पाहिजेत, असंही अजितदादा म्हणाले. शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे. ती राहिलीच पाहिजे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर राहिली पाहिजे, असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. अजितदादांच्या याच वक्तव्यावर आशिष शेलार यांनी खोचक ट्वीट करून राष्ट्रवादीवर टीका केली होती.