मराठी भाषा दिन : जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. १९८७ साली कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर शासनाने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून जाहीर केला.
कविवर्य कुसुमाग्रज
विष्णु वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठेची जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ अथवा ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषेचा थोडक्यात परिचय…
मराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती हि संस्कृतपासून निर्माण झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. तेराव्या शतकापासून ते आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेली आहे आणि सातत्यपूर्ण त्यामध्ये भर देखील पडताना दिसून येते. २०११ च्या जनगणनेनुसार, मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.