नाशिक : एसएमबीटी सेवाभावी संस्थेने आरोग्य सेवा आणि शिक्षण देतांना जी अत्याधुनिक गुणवत्ता राखली आहे, ती भारावून टाकणारी आहे. समाजकल्याणाचा हेतू ठेऊन काम करतांना येथून तयार होणारे डॉक्टर्स समाजाची खरी संपत्ती ठरतील असे प्रतिपादन नाशिक पोलिस परिक्षेत्राचे अधिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या वार्षिक उत्सवात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, संचालक ब्रिगेडियर डॉ. वसंत पवार, मुख्याधिकारी श्रीराम कु-हे, दशरथ वर्पे, एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद चितळे, एसएमबीटी डेंटल संगमनेरचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील, एसएमबीटी डेंटल कॉलेज नाशिकचे प्राचार्य डॉ. किरण जगताप, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड, फार्मसी कॉलेजचे डॉ. अविनाश ढाके आणि डॉ. योगेश उशीर आणि सर्वच प्रमुख डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वराज्याचे नंदनवन उभे करणा-या छत्रपती शिवरायांसारख्या थोर पुरुषांच्या जीवन कार्यातून धडे घेत त्यांच्याआधारे आपली भावी पिढी सज्ज करण्यासाठी प्रयत्न करा. शिवरायांचा स्वराज्य उभारणीतील त्याग आणि शिस्त अंगीकारण्याचा प्रयत्न करा. देशाच्या विकासासाठी विधायक कार्य करा, असा सल्ला नांगरे पाटील यांनी दिला.
विद्यार्थी दशेतील आयुष्य अभ्यास करण्यातच खर्ची करा, वेळेचे नियोजन करून आयुष्य सुंदर बनवा. तारुण्य नाजूक असते, नको त्या गोष्टी करण्यात ते वाया घालवू नका. मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ नका. तुमचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने तुम्हाला हिताच्या चार गोष्टी सांगणे माझा अधिकार आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्ही अस्वस्थ व्हाल तेव्हा कदाचित तारुण्याची आठवण तुम्हाला येईल. तुम्ही आज आयुष्याला आकार दिला नाही तर, भविष्यात त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे तुम्ही आजारी पडाल तेव्हा आरोग्याची किंमत कळेल. आई वडिलांना चांगल्या रुग्णालयात उपचार करू शकणार नाही, तेव्हा आयुष्याची किंमत कळेल. त्यामुळे आताच आयुष्य सजवा आणि घडवा, असेही ते म्हणाले.
अहंकार, राग दूर ठेवा. छोट्या छोट्या कारणासाठी आई वडील, मित्र, नातेवाईक यांच्यासोबतचे संबंध बिघडवू नका. आयुष्यात थकून जाऊ नका, लढत राहा. प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही, हे देखील लक्षात ठेवा, असाही सल्ला त्यांनी दिला.
यांनी लावली हजेरी…
दरम्यान एसएमबीटीच्या वार्षिक उत्सवात यावर्षी प्रसिद्ध सिने अभिनेता राजकुमार राव यांनीही हजेरी लावली. भारतातील सर्वोत्तम आरजे अनमोल यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान यांनी एसएमबीटी क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून फेस्टचा शुभारंभ केला, भारतातील प्रसिद्ध डान्स इंडिया डान्सचा विजेता राघव जुयाल हे देखील फेस्टसाठी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले.