नागपूर : शेतक-यांना कर्जमाफीची प्रतिक्षा लागलेली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी या बाबत आज मोठा खुलासा केला आहे. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण होईस, असं अजित पवार यांनी सांगितलं. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांनी ही माहिती पत्रकारांनी दिली.
पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु आहे. कर्जमाफी देताना आधार लिंक करुन कर्जमाफी देता येईल का याची चाचपणी सुरु असल्याचंही पवारांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची रोड मॅप तयार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती.
संपूर्ण कर्जमाफीसाठी 35 हजार 800 कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्राच्या मदतीशिवाय कर्जमाफी देणे शक्य असल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत विविध खात्यांशी संबंधित आढावा घेतला होता.
विमा कंपन्यांकडे 15 हजार कोटी थकित आहेत. कर्जमाफीसाठी निधी उभारण्याचे अनेक पर्याय सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कर्जमाफीची घोषणा कधी करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.