मुंबई : जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला. या कारवाईचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या प्रकारामुळे विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आता बॉलिवूड कलाकारांनीची त्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला असून केंद्राच्या मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पोलिसांनी निशस्त्र विद्यार्थ्यांवर हिंसक कारवाई केल्याचा आरोप करत अनेकजण विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेध करत त्यांना आपला विरोध दाखवण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं.
विद्यार्थ्यांनी कायद्याला विरोध केला म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अशाप्रकारे बळाचा वापर करणं अत्यंत निंदनीय असल्याचं मत या बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटला रिट्विट करत भाजपच्या आयटी सेलवरच निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं, की “ही शांतता, बंधुता आणि एकता ठेवण्याची वेळ आहे. मी सर्वांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन करतो.” यावर रेणुका शहाणे यांनी म्हटलं, “सर, मग तुम्ही लोकांना तुमच्या सर्व आयटी सेलच्या ट्विटर हँडलपासूनही दूर राहण्यास सांगा. हे आयटी सेलच सर्वाधिक अफवा पसरवतात आणि ते बंधुत्वाच्या, शांततेच्या आणि एकतेच्या विरोधात आहेत. खरी टुकडे टुकडे गँग तुमची आयटी सेलच आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून रोखा.”
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हिंसेचा बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी यांनी देखील निषेध केला. मनोज वाजपेयी म्हणाले, “अन्यायाला रोखण्यासाठी आपल्याकडे शक्ती नाही अशा वेळ येऊ शकते. मात्र, विरोधही करता येणार नाही, अशी स्थिती तयार होता कामा नये. मी विद्यार्थ्यांच्या विरोध करण्याच्या लोकशाही हक्कांसोबत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेचा मी निषेध करतो.”
Sir, please ask people to stay away from all your IT cell Twitter handles then. They spread the most amount of rumours, falsehoods and are totally against brotherhood, peace and unity. The real.”tukde tukde” gang is your IT cell sir. Please stop them from spreading hate 🙏🏽🙏🏽 https://t.co/bMaXDFnvsP
— Renuka Shahane (@renukash) December 16, 2019
विकी कौशलने देखील स्पष्ट भूमिका घेतली आहे. विकी कौशल म्हणाला, “जे काही होत आहे आणि ज्या पद्धतीने होत आहे ते अजिबात योग्य नाही. शांततापूर्ण मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हिंसा आणि गोंधळ दोन्ही गोष्टी निराशपूर्ण आहेत. कोणत्याही प्रकारे नागरिकांचा लोकशाहीवरुन विश्वास उडायला नको.”
विशेष म्हणजे अनुभव सिन्हा यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरही निशाणा साधला. विद्यार्थ्यांवर हिंसक कारवाई होऊनही बच्चन यांनी अद्यापही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. यालाच लक्ष्य करत सिन्हा यांनी 2012 मधील त्यांचं एक ट्विट रिट्विट करत सर बोलले, आनंद झाला, असं उपरोधिकपणे म्हटलं.