एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग बोलत होता. यावेळी बोलताना ते म्हणाला की, सध्याच्या घडीला विराट कोहली क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. ज्याप्रकारे तो शतके आणि धावा करतोय ते कौतुकास्पद आहे. माझ्या मते यापुढे तो सचिनचे अनेक विक्रम मोडेल. पण फक्त सचिनचा दोनशे कसोटी सामने खेळण्याचा विक्रम विराटला मोडता येणार नाही. विराटच काय अन्य कोणत्याही फलदाजाला हा विक्रम मोडणे शक्य नाही. अनेक क्रीडा प्रेमींना कसोटीमध्ये विराट कोहलीपेक्षा स्मिथ सरस असल्याचे म्हटलेय मात्र, सेहवागने कसोटीमध्ये विराटच बेस्ट असल्याचे म्हटलेय.
विरेंद्र सेहवागने यावेळी भारतीय क्रिकेट संघाची निवड समिती अध्यक्षपदासाठी अनिल कुंबळेची निवड करण्यात यावी, यासाठी अध्यक्षपदासाठी मिळणारे मानधनही वाढवण्यात यावे, असे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “माझ्या मते अनिल कुंबळे निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहे. कुंबळे नेहमी सचिन, सौरव आणि द्रविड यासारख्या दिग्गज खेळाडूंशी चर्चा करत असतो. तरुण खेळाडूंनाही त्याने चांगलं मार्गदर्शन केलं आहे. २००७-०८ सालात मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघात पुनरागमन केलं होतं, त्यावेळी अनिल कुंबळेने माझ्या रुमवर येऊन, पुढील दोन मालिकांपर्यंत तूला संघातून काढलं जाणार नाही अस सांगितलं. खेळाडूला अशाच प्रकारच्या आत्मविश्वासाची गरज असते.”