Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगहे काय चाललंय???

हे काय चाललंय???

Rahul Gandhi Unemployment CAB Economy,CAB, Delhi,Economy,Unemployment,Rahul Gandhi,Rape In India,Make In Indiaदेशात महागाई, बेरोजगारी, खालावलेली अर्थव्यवस्था आणि शेतकरी आत्महत्या हे प्रश्न सर्वात गंभीर समस्या आहे. मात्र गोंधळ दुस-याच विषयांचा सुरु आहे. सध्या देशात नागरिकत्व सुधारीत कायद्यावरून ईशान्येकडील राज्ये, धुमसत असताना देशाच्या राजकीय राजधानीला हिंसक वळण लागले. यामुळे देशात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु जे महत्वाचे विषय आहे त्याकडे सत्ताधा-यांच दुर्लक्ष होत चाललंय किंवा जाणूनबुजून ते यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी तेढ निर्माण करणा-या विषयांमध्ये हात टाकत आहेत. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ज्या संसदेमध्ये महागाई, बेरोजगारी देशाचा पडलेला आर्थिक स्तर यावर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु सध्या संसदेमध्ये राहुल गांधी यांनी मेक इन इंडिया नव्हे रेप इन इंडिया या विषयी प्रचार सभेत जे भाषण दिलं. त्यानंतर संसदेमध्ये गोंधळ झाला. पुन्हा राहुल गांधी यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर मी त्या वक्तव्यावर माफी मागण्यासाठी सावरकर नाही अशी भूमिका स्पष्ट केली. आणि पुन्हा देशाचे राजकारण ढवळून निघाले. राहुल गांधीचे प्रतिकात्म पुतळे जाळण्यात आले. सत्ताधा-यांकडून सोशल मिडियावर ‘होय मी सावरकर!’ हे हॅशटॅग चालवले जात आहे. तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारीत कायद्याला विरोध होत असल्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहे. त्यामुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत.

आज देशभरात लाखो सरकारी नोकरीच्या जागा भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बेरोजगारांची फळी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. परंतु याबाबत कुणालाच काही घेणंदेणं नाही. आज विविध विषयांवरून नको त्या चर्चा करुन देशात एका प्रकारे आणीबाणी लागली की काय अशी अवस्था झाली आहे. मात्र, यावरून पंतप्रधानांना चकार शब्दही न काढावा ही मोठी शोकांतिका आहे. महत्वाच्या विषयांवर चर्चा न होता नको त्या विषयांवरून जनतेला वेढीस धरण्यात येत आहे. यामुळे देशामध्ये एका प्रकारे चाललंय काय असा प्रश्न पडला आहे.

एक गट सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतं आहे तर दुसरा गट त्याला विरोध करत आहेत. सोशल मिडियावर या बाबत चर्चा होत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामुळे आपल्या देशाकडे इतर देशांचा बघण्याचा दृष्टीकोन सुध्दा बदलला आहे. देशाची आर्थिक प्रगती विकास कधी होणार याबाबत कधी चर्चा होणार याचा सत्ताधा-यांनी विचार करणे गरजेचं आहे.

लेखक-परवेज खान

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments