
भोपालमध्ये घडलेले ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण आता केवळ एक क्राईम स्टोरी राहिलेलं नाही. हे प्रकरण भारतीय समाजाच्या त्या काळ्या चेहऱ्याला उघडं पाडत आहे, ज्याकडे आपण वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आलो आहोत — विषारी विवाहसंस्था, मानसिक छळ, हुंड्याचा दबाव, प्रतिष्ठेच्या नावाखाली लपवला जाणारा अत्याचार, आणि प्रभावशाली लोकांसमोर नतमस्तक होणारी व्यवस्था.
सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्या म्हणून मांडण्यात आलं. पण जसजशी तपासाची पानं उलगडत गेली, तसतसे प्रश्न अधिक गंभीर होत गेले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट, लिगेचर रिपोर्ट, शरीरावरील जखमा, फॉरेन्सिक तपासातील विसंगती — या सगळ्यांनी अधिकृत कथनावरच संशय निर्माण केला आहे.
आणि या प्रकरणातील सर्वात भयानक गोष्ट म्हणजे केवळ एका तरुण स्त्रीचा मृत्यू नाही, तर “सत्य” हे प्रभाव, पैसा, कायदेशीर खेळी आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या खाली गाडलं जाऊ शकतं, ही भीती आहे.
ट्विशा शर्मा ही कुठली तरी नाव नसलेली आकडेवारी नव्हती. ती सुशिक्षित, आत्मनिर्भर आणि महत्त्वाकांक्षी तरुणी होती. मिस पुणे म्हणून तिने ओळख मिळवली होती. काही चित्रपटांतही तिने काम केलं होतं. नंतर तिने कॉर्पोरेट क्षेत्रात मार्केटिंग मॅनेजर म्हणून करिअर सुरू केलं.
डिसेंबर २०२५ मध्ये तिचं लग्न समार्थ सिंह याच्यासोबत झालं. आणि अवघ्या पाच महिन्यांत ती भोपालमधील सासरी मृतावस्थेत सापडली.
प्रश्न इथून सुरू होतात.
जर ही आत्महत्या होती, तर शरीरावर मृत्यूपूर्वीच्या जखमा कशा? मान, हात, मनगट, बोटं, डोक्याखालील सूज — या सगळ्याचं उत्तर कोण देणार? पोस्टमॉर्टममध्ये गुदमरल्याची चिन्हं दिसत असताना, तपास इतका गोंधळलेला का वाटतो?
आणि मग आलं ते सर्वात धक्कादायक वळण — बेल्टचं रहस्य.
तपासात असं समोर आलं की ट्विशाचा मृत्यू बेल्टमुळे गुदमरल्याने झाला. पण सर्वात मोठा प्रश्न असा की, पोस्टमॉर्टमच्या वेळी तो बेल्ट शवासोबतच नव्हता, असं का सांगितलं जातंय? दोन दिवसांनी अचानक तो फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला गेला, हे नेमकं काय दर्शवतं?
पुरावा कुठे होता?
कोणाच्या ताब्यात होता?
तो लगेच सील का करण्यात आला नाही?
प्रोटोकॉल मोडले गेले का?
की कोणीतरी कथानक आपल्या सोयीने वळवण्याचा प्रयत्न करत होतं?
हे प्रश्न “कटकारस्थान” म्हणून झटकून टाकता येणार नाहीत. हे प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होणारे स्वाभाविक प्रश्न आहेत.
या प्रकरणाला आणखी संवेदनशील बनवणारी गोष्ट म्हणजे आरोपी कुटुंबाची सामाजिक आणि कायदेशीर ताकद. ट्विशाचा पती समार्थ सिंह आणि त्याची आई, निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्यावर मानसिक छळ आणि हुंडाबळीचे आरोप आहेत. समार्थ फरार असल्याचं सांगितलं जात असताना, दुसरीकडे गिरिबाला सिंह यांना अटकपूर्व जामीन मिळतो. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे — कायदा सर्वांसाठी सारखाच आहे का?
जेव्हा प्रभावशाली लोक आरोपींच्या बाकावर बसतात, तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास हादरू लागतो.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक प्रसंग म्हणजे पत्रकार परिषदेत घडलेली वकिलांची प्रतिक्रिया. कुटुंबातील मोठ्या सुनेच्या घटस्फोटाबद्दल प्रश्न विचारला असता, उत्तर देण्याऐवजी उलट पत्रकारांवरच प्रतिप्रश्न फेकण्यात आला — “तुमचाही घटस्फोट होऊ शकत नाही का?”
पण हा प्रश्न केवळ गॉसिप नव्हता. तो एका पॅटर्नबद्दलचा प्रश्न होता. कारण आता या कुटुंबावर याआधीही सुनांना मानसिक त्रास दिल्याचे आरोप समोर येत आहेत. हे आरोप खरे की खोटे, ते तपासातून समोर येईल. पण प्रश्न विचारणाऱ्यांवरच आक्रमक होणं, संशय अधिक गडद करतं.
आणि इथेच ट्विशा शर्मा प्रकरण एका कुटुंबापुरतं मर्यादित राहत नाही. हे संपूर्ण भारतीय समाजाचं आरसंच बनतं.
आज हजारो मुली तथाकथित “प्रतिष्ठित” घरांमध्ये मानसिक गुदमरलेल्या आयुष्य जगत आहेत. त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं — “सहन कर”, “घर टिकव”, “स्त्रीने समजूतदार असावं”, “लग्न म्हणजे तडजोड”.
नवरा दारू पित असेल — सहन कर.
तो अपमान करत असेल — गप्प बस.
सासरचे मानसिक छळ करत असतील — adjust हो.
हुंड्याचा दबाव असेल — निभावून ने.
मानसिक आरोग्य ढासळत असेल — कुणाला सांगू नको.
आणि जेव्हा एखादी मुलगी मदतीसाठी ओरडते, तेव्हा समाज तिलाच परत त्या नरकात ढकलतो — “लग्न वाचव.”
ही शांतता प्राणघातक आहे.
भारतामध्ये विवाहित महिलांमधील आत्महत्या हा आता गंभीर सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न बनला आहे. लग्न हे स्त्रीसाठी सुरक्षिततेचं कवच नसून, अनेकदा तिच्या भावनिक कैदेत रूपांतर होत आहे.
घरगुती हिंसा, हुंड्याचा छळ, पुरुषसत्ताक नियंत्रण, आर्थिक अवलंबित्व, मानसिक अपमान — या गोष्टी अजूनही लाखो महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.
आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे — हा अत्याचार नेहमी उघडपणे दिसत नाही. अनेकदा सर्वात धोकादायक हिंसा ही मानसिक असते. सततचा अपमान, गॅसलायटिंग, भीतीचं वातावरण, वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्या, प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती, एकटेपणाची जाणीव आणि भावनिक छळ — या गोष्टी एखाद्या व्यक्तीला हळूहळू आतून संपवत जातात. जखमा शरीरावर दिसत नाहीत, पण मन पूर्णपणे तुटून जातं.
आजही अनेक पालक मुलीच्या लग्नाआधी मुलाचा पगार, बंगला, गाडी, सामाजिक प्रतिष्ठा, जात आणि राजकीय संबंध तपासतात; पण सर्वात महत्त्वाचे प्रश्न मात्र विचारत नाहीत — तो माणूस म्हणून कसा आहे? रागात तो कसा वागतो? महिलांचा आदर करतो का? त्याला कोणतं व्यसन आहे का? त्या घरात सुनांना खरंच सन्मान मिळतो का? कारण मोठं घर आणि मोठं आडनाव कधीच मुलीच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्ण आयुष्याची हमी देऊ शकत नाही.
समाजाने आता स्त्रियांच्या “मूक सहनशीलतेचं” glorification करणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक सहनशीलता ही ताकद नसते. कधी कधी ती संथ आत्महत्या असते.
ट्विशा शर्मा प्रकरणात सत्य काय आहे, हे न्यायालय आणि तपास सांगेल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे — या प्रकरणाने भारतीय समाजाच्या जखमा उघड्या केल्या आहेत.
आता प्रश्न फक्त ट्विशाला न्याय मिळण्याचा नाही.
प्रश्न आहे — आपण अजून किती ट्विशांना गमावणार आहोत?
समाजाने जागं होण्याची वेळ आता निघून चालली आहे.
आता तरी डोळे उघडा.
कारण प्रत्येक वेळी उशीर झाल्यावर मेणबत्त्या पेटवून न्याय मागण्यात काही अर्थ उरत नाही.

