
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोझरी येथे सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देत शासनाच्या वतीने सकारात्मक आश्वासने दिली. त्यांनी श्री. कडूंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन करताना सांगितले की, त्यांच्या सर्व मागण्यांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत आहे.
राठोड यांनी उपोषणस्थळी बच्चू कडू यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सांगितले की, कडू यांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागांसोबत बैठकाही घेण्यात आल्या असून सभागृह आणि शासन स्तरावर या मुद्यांवर लक्ष वेधण्यात आलं आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीतही या मागण्यांचा विचार केला जाणार असून, प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल.
शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांसंबंधी असलेल्या मागण्यांवर शासन सकारात्मक पाऊल उचलणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या मशागत आणि पेरणीची कामं सुरू असून, कडू यांची प्रकृती लक्षात घेता त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असं आवाहन राठोड यांनी केलं.
यापूर्वी सकाळी त्यांनी तिवसा येथील विश्रामगृहात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि नंतर गुरूकुंज मोझरी येथे तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

