
राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा तिसऱ्या ऐच्छिक भाषेऐवजी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही.”
भारतीय कामगार सेना या शिवसेना (उबाठा)च्या कामगार आघाडीच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले की, “हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण ती जबरदस्ती लादली जात असेल, तर तो विरोध आवश्यक आहे.” मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेला अनिवार्य तिसरी भाषा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सध्या वादग्रस्त ठरला असून, विरोधी पक्षांकडून त्याला तीव्र विरोध होत आहे.
ठाकरे यांनी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाला फटकारत राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, भाषेवर प्रेम असावे, पण ते प्रेम सक्तीच्या माध्यमातून निर्माण होत नाही. विद्यार्थ्यांवर भाषा लादण्याचा प्रयत्न म्हणजे भाषिक विविधतेला धोका निर्माण करणारा निर्णय आहे, असे ते म्हणाले.

