मुंबई : डिसेंबर महिन्यात राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पहाटेपासूनच मुंबईसह ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळू लागल्या. तसेच वातावरणही संपूर्ण ढगाळ आहे. पुढील पाच दिवसांत राज्यातील काही भागांत अशाच प्रकारे पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीतील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील काही भागांत ११ आणि १२ डिसेंबर रोजी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज
- १२ डिसेंबर – आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
- १३ डिसेंबर – आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता
- १४ डिसेंबर – आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता.
- १५ डिसेंबर – आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता.
- १६ डिसेंबर – हवामान कोरडे राहण्याची शक्यता