Tuesday, May 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात 'नो डिनायल पॉलिसी' लागू होणार – अजित पवारांचा आरोग्य सेवेला दर्जा...

राज्यात ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू होणार – अजित पवारांचा आरोग्य सेवेला दर्जा देण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'आपला दवाखाना' प्रकल्पांतर्गत ४३ नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा दिला शब्द

maharashtra, health, ajit pawar, policy, maharashtra health ajit pawar policy, आरोग्य सेवा, अजित पवार,  नो डिनायल पॉलिसी

निरोगी नागरिक हेच राज्याच्या प्रगतीचे बळ असून, दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ‘राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र’ इमारतीच्या भूमिपूजन आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ प्रकल्पांतर्गत राज्यातील नव्याने सुरु होणाऱ्या ४३ दवाखान्यांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

राज्य शासन लवकरच ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार असून, कोणतेही रुग्णालय अत्यावश्यक वैद्यकीय सेवा नाकारू शकणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. गरजू नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा मिळाल्याच पाहिजे, यासाठी ही नवी धोरणात्मक पावले उचलण्यात येणार आहेत.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेस वेळेवर उपचार न मिळाल्याने झालेल्या मृत्यूबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. अशा घटना टाळण्यासाठी एक सशक्त आरोग्य प्रणाली आणि कठोर नियम लागू करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात उभारल्या जाणाऱ्या ‘राज्य कुटुंब कल्याण भवन’मुळे आरोग्य विभागाच्या सर्व कार्यालयांना एकत्र आणून कामात गतिमानता आणि पारदर्शकता येईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले. पुण्यातील ७ नवीन ‘आपला दवाखाना’ शहरी झोपडपट्टीतील नागरिकांसाठी वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्याची प्रशंसा करताना ग्रामीण आणि दुर्गम भागातही पोहोचलेली आरोग्यसेवा ही सरकारच्या कामगिरीची ओळख असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जागतिक हिवताप दिनानिमित्त आयोजित रॅलीला आरोग्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

तसेच, राज्यातील ८ परिमंडळांतील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र सुरु करण्याची तसेच पुण्यात रेण्वीय निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments