यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीच्या वेळी झालेल्या विधबाधेतून २२ शेतकऱ्यांच्या मृत्यूची घटना अतिशय गंभीर आहे. याबाबत दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या हत्या असून यास कीटकनाशक उत्पादक कंपन्या, विक्रेते आणि त्यांना पाठीशी घालणारे कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असे मुंडे म्हणाले. यवतमाळ घटनेतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
बावीस शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर ५ कृषी केंद्र चालकांवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे असूनही त्यांनी यवतमाळला ना भेट दिली ना संवेदना व्यक्त केली. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घ्यायला त्यांना वेळ नाही का? असा सवाल करून मुंढे यांनी या घटनेतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या तातडीने १० लाख तर जखमींना २ लाख रुपयांची मदत करावी. जखमी शेतकऱ्यांवर चांगल्या रुग्णालयात उपचार करावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली. यवतमाळ सारख्याच घटना नागपूर, बुलढाणा, अकोलासह अनेक जिल्ह्यात होत आहेत, हे लोण पसरत आहे. सरकारने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मुंडे यांनी केली आहे.