पर्थ: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी धडाका सुरूच आहे. भारताने आज सोमवारी (२४ फेब्रुवारी) बांगलादेशला १८ धावांनी मात देत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजय मिळवला. या सामन्यातही पूनम यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. सोळा वर्षीय सलामीवीर शेफाली वर्मा आजच्या सामन्याची मानकरी ठरली. शेफालीने १७ चेंडूत ३९ धावांची तडाखेबंद खेळी केली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १४२ धावा करत बांगलादेशपुढे विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ८ बाद १२४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
भारताकडून पूनम यादवने ४ षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स घेतल्या तर शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताने सलामीच्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता.