ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९६ धावा केल्या. अनुभवी स्टीव्ह स्मिथचे शतक (१३१) आणि मार्नस लाबूशेन, विल पुकोव्हस्कीची अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात मिळवून दिली. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर हे दोघे माघारी परतले. पण या दोघांनी एक पराक्रम केला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा शुबमन गिलसोबत मैदानावर आला. या दोघांनी ७० धावांची दमदार भागीदारी केली. दोघेही शांत आणि संयमी खेळ करत होते. या दोघांनी २७ षटके एकत्र खेळली.
New year, new opening partnership for India.
Starc’s got the ball. Watch #AUSvIND on @FoxCricket, @7Cricket & @kayosports pic.twitter.com/SzeEt4ONO2
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
भारतीय सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेर कसोटी क्रिकेट खेळताना २० पेक्षा जास्त षटकं खेळण्याचा योग तब्बल ११ वर्षांनंतर जुळून आला. याआधी २०१० साली दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन मैदानावर विरेंद्र सेहवाग-गौतम गंभीर जोडीने असा पराक्रम केला होता.
रोहित शर्मा – शुबमन गिल जोडीने आणखी एक पराक्रम केला. पहिल्या दोन कसोटींमधील चार डावांत मिळून भारतीय सलामीवीरांनी जेवढी षटके खेळली त्यापेक्षा जास्त षटकं रोहित-गिल जोडीने एकाच डावात खेळली.
पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शुबमन गिल या तीन सलामीवीरांनी एकूण मिळून पहिल्या दोन कसोटीत म्हणजे चार डावांत ८.५ षटके खेळली होती. रोहित-गिल जोडीने पहिल्याच डावात २७ षटके खेळपट्टीवर तग धरला.
दरम्यान, जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बचावात्मक फटका खेळताना रोहित झेलबाद झाला. त्याने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. शुबमन गिलने डाव पुढे नेत आपलं पहिलं कसोटी अर्धशतक झळकावलं, पण त्यानंतर लगेचच तोही झेलबाद झाला. १०१ चेंडूत ८ चौकारांसह त्याने ५० धावा केल्या.