पुणे: अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याला आपला पाठिंबा असल्याचे ‘एल्गार परिषद २०२१’ च्या आयोजकांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. परिषदेत भारत आणि हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० जानेवारी २०२१ रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, एल्गार परिषदेचे एक आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी यापूर्वीच शरजीलच्या वक्तव्याबाबत माफी मागितली होती. “शरजील चांगलं बोलला पण त्याने ‘मनुवादी’ ऐवजी ‘हिंदू’ शब्द वापरला ही त्याची चूक झाली,” असं कोळसे पाटील यांनी म्हटलं होतं.
यासंदर्भात ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ या आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर न्या. कोळसे पाटील यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये शनिवारी संध्याकाळी एक निवेदन दिलं. यामध्ये त्यांनी म्हटलं, “३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं दिलेलं भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि त्यांच्या संघ परिवाराकडून चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात आहे. शरजीलला लक्ष्य करुन संघ परिवाराने पुन्हा एकदा आपला धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला आहे”
शरजीलवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक शरजील उस्मानीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं कोळसे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. शरजीलवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.