नवी दिल्ली l कृषी कायद्यावरून Farm laws शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी RlP चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल Hanuman Beniwal यांनी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवला. हनुमान बेनीवाल यांचा पक्षही NDA मधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. बेनिवाल 26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांसह दिल्लीकडे पाठिंब्यासाठी धडकणार आहेत.
NDA मध्ये राहायचं की नाही? हा निर्णयही तिथेच होणार असल्याची माहिती RLP कडून देण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 24 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात NDAतील घटक पक्ष असलेल्या RLPचाही समावेश आहे. RLPचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल यांनी यापूर्वीच शेतकरी आंदोलनाला आपलं समर्थन असल्याचं म्हटलंय.
3 समितींच्या सदस्यत्वाचा राजीनामा
बेनिवाल यांनी यापूर्वीच संसदेच्या 3 समितींच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्यात उद्योगांसंबधी स्थायी समिती, याचिका समिती आणि पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाची सल्लागार समितींचा समावेश आहे. बेनिवाल यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठवला आहे.
2 लाख शेतकऱ्यांसह दिल्लीकडे रवाना होणार
हनुमान बेनिवाल यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याचा सातत्यानं विरोध केला आहे. यापूर्वी त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली होती. आता 26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांसह राजस्थान ते दिल्ली पायी मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर दिल्लीत पोहोचल्यावर NDA मध्ये राहायचं की नाही? याबाबतही घोषणा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
बेनिवालांचं अमित शाहांना पत्र
बेनिवाल यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कृषी कायद्यांबाबत एक पत्रही लिहिलं होतं. केंद्र सरकारनं नवे कृषी कायदे रद्द केले नाहीत, तर NDAमध्ये राहायचं की नाही याचा विचार करु, अशी भूमिका बेनिवाल यांनी घेतली आहे.