नवी दिल्ली : कोरोनाचा जगभरात थैमान सुरुचं आहे. भारतात कोरोनाग्रस्त पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये एका महिलेचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला झाला आहे. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या १९६ वर पोहोचली आहे.
राजस्थानच्या जयपूरमध्ये ६९ वर्षांची इटालियन पर्यटक महिला भारतात आली होती. तपासणीत तिला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं होतं. तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या आता १९६ वर पोहोचली आहे. त्यापैकी १३ जणांवरील उपचार यशस्वी ठरलेत. हे १३ जण व्हायरसमुक्त झालेत.
कोरोनासारख्या महामारीला जनतेनंच हरवायचं आहे यासाठी घराबाहेर न पडता काळजी घ्या आणि सतर्क रहा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. रविवारी २२ मार्चला कोणीही घराबाहेर पडू नका संचारबंदी लागू करण्यात येणार असून सगळ्यांनी त्यांचं पालन करावं असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे. पण या सगळ्यात कुठेही अन्यधान्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी ग्वाहीदेखील मोदींकडून देण्यात आली आहे.