मुंबई: दिल्लीच्या वेशीवर सध्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. आंदोलनावरून इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश सोमवारी दिले आहे.
दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक
झूम मीटिंदरम्यान काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचं सांगण्यात आलं.
भाजपाच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आलं का?
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंबंधी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, ‘कोणीही व्यक्तिगत पातळीवर मत व्यक्त करत असेल तर त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण ट्विटची वेळ, भाषा पाहिली तर हे भाजपाच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आलं का? याबाबत शंका निर्माण होते. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांच्या ट्विटमधील शब्द समान आहेत. सुनील शेट्टीच्या ट्विटमध्ये भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे भाजपाच्या स्क्रिप्टप्रमाणे हे करण्यात आलं का? ही शंका निर्माण होते”.
Demanded investigation of BJP connection into the tweets of celebrities & security to be provided to our national heroes if needed & find out whether these celebrities were arm-twisted by BJP. @AnilDeshmukhNCP
Ji ordered investigation by Intelligebce unit. https://t.co/KkMfFqzLcc— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 8, 2021
गांभीर्य ओळखून गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
“देशपातळीवर मोठा प्रचंड दबाव संविधानिक संस्था तसंच विरोधी सरकारांवर आहे. जो कोणी विरोध करेल त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्याच पार्श्वभूमीवर यांच्यावरही दबाव आणलेला असू शकतो. दबावात राहता कामा नये आणि बोलायचं असेल तर निर्भीडपणे बोलावं ही महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे. मोदी सरकार हे करत असेल आणि ते हे करण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही चौकशीची मागणी केली होती. त्याचं गांभीर्य ओळखून गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत,” अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.